पत्रकार – प्रशांत डिंगणकर : आमच्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गावगाड्यातील अत्यंत लोकप्रिय लोककला म्हणजे “नमन -खेळे” होय. या लोककलेला मोठी परंपरा आहे. आमच्या कोकणातील माणसाने ही लोककला अत्यंत जिवापाड जपली आणि वाढवली. या लोककलेशी आमची धार्मिक, सामाजिक नाळ जोडलेली आहे..आमच्या कृषी प्रधान जगण्याचे खूप संदर्भ यात आपसूकच विणले गेले आहेत.याच लोककलेतील अत्यंत लोकप्रिय पात्र म्हणजे शंकासूर… (संकासूर, अथवा सकासूर)
त्याला अनेक छटा आहेत. पुराणात हा शंकासूर राक्षस असला तरी कोकणात तो देव झालेला आहे. माझ्या हा अभ्यासाचा विषय असून मी माझ्या एका पुस्तकाचे प्रकाशन ठाण्यात शंकासूराच्या हस्ते केले होते.
आमचा शिमगोत्सव म्हणजे आमच्या शेतीवाडीचे रक्षण करणाऱ्या ग्रामदैवतेचा शंकासूर घरी येण्याची वेळ… त्याच्या झुबकेदार मिशा, पांढरी दाढी…
हातातली वेठी, कंबरेतले घुंगरू.. काळे कपडे… रुबाबदार चालणे आणि नाचणे या सगळ्यातून हे पात्र आमच्या जगण्याचे अविभाज्य भाग झाले.आहे. गावगाड्यात दैवत्व प्राप्त झालेला शंकासूर आणि त्या भोवती मृदुंग, टाळ याच्या विशिष्ट ठोक्यावर गुंफलेला खेळ आणि त्यातील परंपराचा अपमान करणारी वेब सिरीज म्हणजे देवखेळ… आमच्या लोककलांचा असा पोरखेळ तातडीने थांबवा.
एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाची कथा सांगण्यासाठी या वेबसिरिज मध्ये शंकासूर आणि आमच्या खेळ्यांचा वापर केला गेला. जो अत्यंत अवमानकारक आहे. नवीन काहीतरी भन्नाट करण्याच्या नादात आमच्या या लोककलेचा असा वापर करणे आम्हाला मान्य नाही. आता कोकणात शिमग्याचा सण तोंडावर आहे. शंकासूर बाहेर पडण्याची वेळ आहे. कोकणी माणसाला आता शिमग्याचे वेध लागलेत. आमची ट्रेन, एसटी, बसची बुकिंग झालेली आहेत. त्यामुळे आमचा सण खराब करु नका.नेमका हाच माहोल पकडून धंदा करता यावा म्हणून टायमिंगवर “झी5” ने ही वेबसिरिज रिलिज केली आहे. तुम्हाला करायचा तो धंदा करा पण आमच्या लोकलांचा असा वापर करुन जगासमोर विपर्यास मांडलेला आम्हाला मान्य नाही. त्यामुळे वेळीच ही वेबसिरिज मागे घ्या, नाही तर कोकणात होळी ऐवजी वेबसिरिजचा वाद पेटेल.
या वेबसिरिजचा दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड माझा महाविद्यालया पासूनचा चांगला मित्र आहे. अत्यंत गरिबीतून सामान्य कुटुंबातून आलेला हा चंद्रकांत गेली अनेक वर्षे स्ट्रगल करुन नावारुपाला आला. त्याबद्दल माझ्या मनात प्रेम आहेच.
पण तरीही मित्राच्या अशा चूका माफ करता येणार नाहीत. हा प्रश्न आमच्या मैत्रीचा नाही. आमच्या कोकणातील अस्मितेचा आहे.
एक तर ही सिरिज मी पाहिलेली नव्हती. पण वादाच्या बातम्या आल्यानंतर मी इंटरनेटवल जाऊन नेमका काय विषय हे पाहिले तेव्हा विषय लक्षात आले व याचा दिग्दर्शक चंद्रकांत आहे हेही मला त्याचवेळी कळले.
मी चंद्रकांतशी बोलललो त्या मागची त्याची भूमिका समजून घेतली. त्याने विनंती केली की तू एकदा बघ आणि मग ठरव. त्याच्या म्हणण्या प्रमाणे त्याला लोककलेचा अनादर करायचा नाही. त्याची कथा गुन्हेगाराचा पाठलाग करणारी आहे. आम्हाला शंकासूराबाबत काही बोलायचे नाही. त्याच्या आतला माणूस मांडायचा आहे असे चंद्रकांत सांगतो.
चिपळूण परिसरातील दोन लेखकांनी याचे लेखन केलेले आहे, असे तो सांगतो. मुळात शंकासूराचा पेहराव जे घालतात त्याचे पण आमच्या कोकणात मान आहोत. हे मान पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहेत. कोणीही उठावे आणि शंकासूर व्हावे असे नाही. जेव्हा जो शंकासूर होतो तो माणूस नाही तर श्रध्दाळूंचा तो देव ठरतो. तुम्ही आमच श्रध्दा आणि अंधश्रद्धा यांचे असे खोटे, आभासी, फसवे, बटबटीत कथानक उभे करुन मुल्यमापन करणारे कोण?
त्यामुळे आमच्यासाठी शंकासूर देव आहेच पण त्या आतला माणूस ही देवच आहे. त्यामुळे हा चंद्रकांत जो युक्तीवाद करु पाहतोय तोही न पटणारा आहे. ही कथेतील चूक आहे. कथा रंजक व अधिक आकर्षक करण्यासाठी शंकासूर व खेळ्यातील पात्र व रंग छटा या कथेत जबरदस्तीने भरण्यात आल्या आहेत.
त्यामुळे मुळ कथेतील चूक ती आता मलमपट्टी लावून दुरुस्त होणारी नाही.
ती कथा मांडण्यासाठी जो पट वापरला आहे तो आमच्या श्रध्देचा, भावनेचा आणि पवित्र जागेचा वापर करण्यात आला आहे. कथा तुमची काहीही असली तरी ज्या
कोकणातील माणूस, कोकणातील कला, देवदैवते, सण आणि उत्सव याचा थेट संदर्भ यामध्ये वापरण्यात आले आहेत त्यामुळे आमचा अपमानच करण्यात आला आहे. उद्या कोणी उठेल आणि आमचा शंकासूर, देवीची पालखी, ग्रामदैवते, आमच्या प्रथा परंपरा उचलून हवी ती कथा त्यात घालून जगाला दाखवेल. आम्हाला हे मान्य नाही. आज जगभरातील अभ्यासकांच्या दृष्टीने महाराष्ट्रातील लोककला हा अत्यंत कुतुहलाचा विषय आहे. अशावेळी आम्ही आमच्या लोककलांचा आमच्या शंकासूराचा हा धंदेवाईक “खेळ” मान्य करणार नाही.
चंद्रकांतने गुहागरला जाऊन माफी मागून आम्ही शंकासूरवर एक माहितीपट तयार करु असे मान्य केले आहे. पण त्याने विषय संपणार नाही. ज्या पध्दतीने या कथेत शंकासूर गुंफला आहे तो अवमानकारकच आहे. आमच्या अडूर गावातील सुकाई देवीच्या शंकासूराच्या होळीवरील पाचव्या दिवशीच्या खेळाचा थेट संदर्भ यामुळे चंद्रकांतने वापरलेला आहे. त्या गावातील शंकासूराचा हा खेळ अत्यंत धार्मिक आणि पौराणिक दृष्टीने खूप लोकप्रिय आहे. त्याचा अशाप्रकारे वापर करता येणार नाही. अत्यंत चूकीचे चित्रिकरण यात करण्यात आले असून त्यांची कथा पुढे जाईल पण आमच्या लोककलेला बदनाम करुन जाईल. त्यामुळे अडूर गावातील ग्रामस्थांनी ही हे मान्य करु नये, असे मला वाटते.
तातडीने ही वेबसिरिज डिलीट करावी. दुसरा कुठल्याही प्रकारचा पर्याय कोकणी माणूस मान्य करु शकत नाही.

