गुहागर [उदय दणदणे] : गुहागर तालुक्यात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून येथील ग्रामीण शासकीय आरोग्य सेवाच व्हेंटिलेटरवर असल्याचे अनेकदा समोर येत आहे, काही दिवसांपूर्वी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे वरवेली येथील महिलेला आपले बाळ गमवावे लागले आहे व सदर महिला मरणाच्या दारातून वाचली आहे.अशा अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली असून सदर बाबत असगोली येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल उल्हास कनगुटकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक- रत्नागिरी,तालुका आरोग्य अधिकारी- गुहागर,जिल्हा आरोग्य अधिकारी -रत्नागिरी, उपसंचालक -आरोग्य सेवा कोल्हापूर, आमदार भास्करशेठ जाधव यांना ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टर ग्रामीण रुग्णालय येथे पूर्ण वेळ देऊन रुग्णांची सेवा करण्याबाबतचे निवेदन दिले आहे. निवेदनात कनगुटकर यांनी वरवेली ग्रामस्थांच्या मागणीचे संदर्भीय घेऊन म्हटले आहे की गुहागर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर पूर्णवेळ रुग्णांची तपासणी न करता आपला तो वेळ खाजगी रुग्णालयामध्ये पैसे कमवण्यासाठी घालवत असून रुग्णालयांमध्ये येणारे रुग्ण कोणत्या स्थितीमध्ये आहेत, मरत आहेत की जिवंत आहेत हे पाहण्याची सुद्धा तसदी घेताना दिसत नाहीत, सदर डॉक्टर कोणत्या नियमानुसार ग्रामीण रुग्णालय तसेच आपल्या खाजगी रुग्णालय मध्ये सुद्धा प्रॅक्टिस करीत असतात याबाबत त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करून सुद्धा त्यांच्याकडून कोणतेही कारवाई होताना दिसत नाहीत यामध्ये संबंधित अधिकारी यांचासुद्धा सहभाग असल्याचा आमचा संशय असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
राहुल कनगुटकर यांच्या निवेदनाची जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी यांनी सदर विषयी गांभीर्यतेने दखल घेतली असून दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी डॉ. निलेशकुमार ढेरे यांना ज्ञापन पत्र काढून खुलासा मागविला आहे की प्राप्त झालेल्या तक्रारी नुसार दि.६ फेब्रुवारी २०२६ रोजी आपल्याला तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या, परंतु सदर तक्रारीनुसार आपली खाजगी वैद्यकीय सेवा सुरूच असून आपल्या वागण्यात कोणत्याही प्रकारचे बदल दिसून आलेले नाहीत, तसेच आपण दोन्ही ठिकाणी काम चालू ठेवू असे ठणकावून सांगत आहात, सदर बाब अत्यंत गंभीर कार्यालयीन शिस्तीत धरून नाही तसेच आपण पूर्ननियुक्ती करारनाम्यानुसार खाजगी वैद्यकीय सेवा करू शकत नाही, तरी याबाबतचा खुलासा २४ तासाच्या आत कार्यालयास सादर करावा, डॉ. ढेरे यांचा योग्य खुलासा प्रात न झाल्यास आपले कोणतेही म्हणणे नाही असे गृहीत धरून डॉ ढेरे यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कार्यालयीन कारवाई करण्यात येईल असे ज्ञापन पत्र काढून फर्मावले आहे.
काही महिन्यापूर्वी संबंधित डॉक्टर यांना ग्रामस्थांच्या वतीने समाज देण्यात आली होती. तरीसुद्धा सदर डॉक्टर आपल्या वागण्यामध्ये कोणत्याही प्रकारे बदल करताना दिसत नाहीत, तसेच आपण दोन्ही ठिकाणी माझे काम चालू ठेवणार असल्याचे ठणकावून सांगत आहेत, याचा अर्थ आम्ही ग्रामस्थ म्हणून काय समजावा..? असा प्रश्नही कनकुटकर यांनी उपस्थित केला आहे, पंधरा दिवसांपूर्वी याबाबत डॉक्टर ढेरे यांना जिल्हा शल्य चिकित्सक रत्नागिरी यांनी आमच्या समक्ष समज देऊन त्यांच्या वागणुकीबाबत लेखी स्वरूपात त्यांचे म्हणणे मागितले होते, परंतु चौकशी करता असे समजले की सदर डॉक्टर यांनी याबाबत कोणताही खुलासा आजतगायत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे सादर केलेला नाही, काही दिवसापूर्वी यांच्या हलगर्जीपणामुळे वरवेली येथील महिलेला आपले बाळ गमवावे लागले आहे व सदर महिला मरणाच्या दारातून वाचली आहे, अशा अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी कनगुटकर यांनी निवेदनातून केली आहे.

