मुंबई प्रतिनिधी (शेखर म्हात्रे ) : आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस आयुक्तलयाच्या विविध उपक्रमाचे लोकार्पण पार पडले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज डी. बी. नगर (दक्षिण मुंबई), वरळी (मध्य मुंबई) आणि गोवंडी (पूर्व मुंबई) येथे अत्याधुनिक सायबर प्रयोगशाळांचे उदघाटन करण्यात आले. महिलांविरोधातील सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, बँक हॅकिंग, मोबाइल व डेटा टेम्परिंगसारख्या गुन्ह्यांच्या जलद व अचूक तपासासाठी या प्रयोगशाळा क्रांतिकारी ठरणार आहेत.
जगातील अत्याधुनिक सायबर फॉरेन्सिक टेक्नॉलॉजीने सज्ज या प्रयोगशाळांमुळे डिलीट झालेला डेटा ‘रिकव्हर’ करणे, पुरावे संकलन, आणि तपास प्रक्रियेला गती मिळणार आहे. सायबर गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी सायबर गुन्ह्यांमधील तपासात सायबर प्रयोगशाळा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यासाठी शासन प्रयोगशाळा निर्माण करीत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर प्रयोगशाळांचे जाळे अधिकाधिक सक्षम करण्याच्या सूचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. कार्यक्रमास राज्यमंत्री योगेश कदम, अप्पर मुख्य सचिव, पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.