खेड: महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यादरम्यान खेड तालुक्यातील दहिवली गावातील दरडग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दहिवली येथे दरड कोसळून बाधित झालेल्या कुटुंबांना तातडीने नवीन घर बांधण्यासाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांची शासकीय मदत महसूल मंत्र्यांनी जाहीर केली असून, यामुळे संकटग्रस्त नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे.
दहीवली गावामध्ये दरड कोसळल्याने स्थानिक नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. या आपत्तीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांचे लवकरात लवकर पुनर्वसन व्हावे, यासाठी भाजप नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांना अधिकृत निवेदन सादर केले होते. या निवेदनाची तात्काळ आणि गंभीर दखल घेत महसूल मंत्र्यांनी बाधित कुटुंबांच्या घरबांधणीसाठी हा निधी तत्काळ मंजूर केला.
तसेच, या दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना आणखी अधिक शासकीय मदत मिळवून देण्याच्या उद्देशाने रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण नुकसानीचा सविस्तर अहवाल लवकरात लवकर तयार करून सादर करण्याचे स्पष्ट निर्देशही या दौऱ्यादरम्यान देण्यात आले. विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार आणि ॲड. वैभव खेडेकर यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे दहिवलीतील नागरिकांना वेळेवर मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या निर्णयामुळे सर्व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
